राज्यात पुन्हा पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात उद्यापासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी पावसाबद्दल माहिती दिली आहे. पावसाळी रविवार, आज मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळ पासून पावसाच्या हलक्या ते माध्यम सरी होत असून द. कोंकणात आज जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे. एकंदर राज्यात मध्यम पाऊस असेल. रडार व उपग्रह तशी स्थिती दर्शवत आहेत. असं त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच, आयएमडी मॉडेल नुसार मंगळवार / बुधवार, १४ व १५ जुलै रोजी, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

सोमवारपासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले.
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात किनारपट्टीसह राज्यभरात मान्सून सक्रीय होणे, दक्षिण गुजरातमधील चक्रवाती वर्तुळाकार स्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीदेखील झाली. त्यानंतर गेल्या तीन दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले होते.

सोमवारपासून पुन्हा मान्सून सक्रीय होत असून दक्षिण कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तसेच अंतर्गत भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या दिर्घकालिन विस्तारीत पूर्वानुमानानुसार १६ जुलैपर्यंत अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतरच्या दोन आठवडय़ात मराठवाडय़ात काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी होईल मात्र इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील