चंद्रपूर शहर व जिल्ह्यात आज सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. दरम्यान घुघुस येथे बेलबंडीवर वीज कोसळल्याने शंकर वैद्य (33) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

चंद्रपुरात सायंकाळी ४ वाजता ढग दाटून आले  व मुसळधार पावसाला सुरुवात झाली.  पावसाचा वेग इतका होता की, अवघ्या काही तासांत रस्त्यावर पाणी साचले, कस्तुरबा मार्ग, सिटी शाळा, आझाद बगिच्या, जयंत टॉकीज भागात पाणी साचले. पावसामुळे अनेक भागात झाडे कोसळली, तर वीज खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील गोल बाजारात देखील पाणी साचले होते.