वाई : सातारा शहरासह जिल्ह्य़ातील बहुतांश भागांत मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. साताऱ्यानजकीच्या कास, बामणोली, वाई शहरासह कवठे गावात पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्ह्य़ातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. रात्री झालेल्या पावसामुळे अनेक भागात ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. पावसामुळे भात खाचरे भरू लागली आहेत. दुपारनंतर महाबळेश्वर आणि पाचगणी येथे पावसाबरोबरच अधूनमधून ऊन पडत आहे. आज सकाळी आठ वाजताच्या माहितीनुसार कोयना धरणात ३०७८ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरणात २८.७१ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेत ५३ मिलिमीटर, नवजा येथे ५८ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने जमिनीतील ओल वाढल्याने जिल्ह्य़ात अनेक भागात सुरू झालेल्या खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. महाबळेश्वर क्षेत्रात महाबळेश्वर प्रतापगड कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. वाई तालुक्यातील धोम, धोम-बलकवडी, नागेवाडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसाने कोणतेही नुकसान झाल्याची माहिती मिळाली नाही. दुष्काळी भागात फलटण माण-खटाव परिसरात पाऊस झाला नाही. या भागात पाऊस असल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.