राज्यातील बहुतांश भागांमध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसत आहे.तसेच शिवारामध्ये पाणी साठले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ मिलिमीटर इतकी असून लातूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी ९९३.२२ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.  काही दिवसांपूर्वी दुसऱ्या जिल्ह्यातून पाणी आणावे लागणाऱ्या लातुर जिल्ह्यातील धरण प्रकल्प, नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. पावसाने दिलासा दिला असला तरी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. तर जळकोटमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. या तालुक्‍यातील बोरगाव येथे ब्रम्हादेवाचे मंदिर पाण्याखाली गेले आहे.
मराठवाड्यात लातूरसह नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस पडत होता. जळकोटसह चाकूर, निलंगा, रेणापूर, अंबाजोगाई, माजलगाव, तुळजापूर, उस्मानाबाद, भूम तालुक्‍यांत पावसाचा जोर जास्त आहे. पहाटेपासूनच्या मुसळधार पावसामुळे आरखेड, घोडा, उमरथडी, सोमेश्‍वर, फळा, सायाळ, पुयणी, आडगाव, वनभुजवाडी या गावांचा संपर्क सकाळपासून तुटला आहे. पुणे शहरातही दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये पावसाची रिमझिम दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि भोरमध्येही दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे.