रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. काल दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे नागोठणे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा बसलेला आहे. शहरातील एसटी स्थानक, कोळीवाडा, शिवाजी चौक, बाजारपेठ, बांगलेआळी या भागांमध्ये सुमारे २-३ फुट पाणी शिरलं आहे. याव्यतिरीक्त शहराच्या सखल भागांमध्येही पाणी साचलं आहे. रात्रभर पाऊस सुरु राहिल्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यासारख्या यंत्रणाही हायअलर्टवर आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर सुरु असल्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. याचसोबत सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती न पसरवण्याचं आव्हानही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातला महत्वाचा आंबेत पूल पडल्याची अफवा काल दिवसभर सोशल मीडियावर पसरत होती, मात्र हे वृत्त खोटं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.