वीज दर वाढीचा अधिकार हा वीज नियामक आयोगालाच आहे. आयोगाच्या मंजुरीशिवाय कोणत्याही कंपनीला वीज दरवाढ करता येत नाही. आदानीने ज्यादा वीज बिल आकरल्या प्रकरणी वीज नियामक आयोगाने नेमलेल्या समितीची चौकशी सुरू आहे. समितीच्या चौकशिचा अहवाल अजून आला नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

29 ऑगस्ट 2018 रोजी रिलायन्स पावर ही कंपनी अदानी इलेक्ट्रीसिटीने घेतली. तेव्हापासून 2.25 लाख ग्राहकांची वीजबिले वाढीव येत आहेत अशी तक्रार आमदारांनी केली होती. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, वीज नियामक आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल 30 जून पर्यंत येईल. तो जनतेसाठी खुला राहील. त्यावर आपली मतेही नोंदविता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी टाटा पावरच्या रिसि‍व्हींग स्टेशनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चौकशीची माहिती दिली. मुंबई शहराला वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पावरच्या रिसि‍व्हींग स्टेशनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी शासन चौकशी करीत असून दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस टाटा पावरवर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 21 एप्रिल रोजी टाटा पावरच्या परळ रिसिव्हिंग स्टेशनमध्ये 110 केव्ही ब्रेकरमध्ये स्फोट झाल्याने रिसिव्हिंग स्टेशनचे काम बंद पडले. त्यामुळे नायगाव, परळ, लालबाग, भायखळा, माझगाव येथील काही भागांमधील वीज पुरवठा खंडित झाला. तासाभरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या प्रकरणी दोषी आढळलेल्या टाटाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस शासन करणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.