नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हिंगणा मतदारसंघात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सागर मेघे पुन्हा इच्छुक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असून येथून पक्षाचे नेते रमेश बंग पुन्हा लढतात, की पक्ष नव्या चेहरा देतात हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीकडे बंग यांच्याशिवाय दुसरा प्रबळ उमेदवार नसल्याने आणि ते सलग दोन वेळा पराभूत झाल्याने काँग्रेस या जागेवर दावा करू शकते. त्यामुळे सध्यातरी भाजपच्या समीर मेघे यांच्या विरुद्ध कोण लढणार असेच चित्र मतदारसंघात आहे. २००९ पूर्वी या मतदारसंघातून सलग दोन वेळा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला २००९ च्या निवडणुकीत प्रथमच भाजपने पराभूत केले. पक्षाचे नेते व माजी मंत्री रमेश बंग यांचा भाजपचे विजय घोडमारे यांनी केवळ ७०० मतांनी पराभव केला होता. मात्र २०१४ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली व समीर दत्ता मेघे यांना संधी दिली. याही वेळी रमेश बंग यांचा मेघे यांनी पराभव केला होता. यंदा पुन्हा त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येथे नवीन चेहरा देण्याचा विचार झाल्यास बंग यांच्या मुलाचे नाव पुढे येऊ शकते. २००९ मध्ये येथून विजयी झालेले भाजप नेते विजय घोडमारे सध्या पक्षात नाराज आहे. त्यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे हे येथे उल्ले्खनीय. दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार समीर मेघे हेच पुन्हा रिंगणात राहण्याची शक्यता आहे. पक्षातून त्यांना आव्हान देऊ शकणारे दुसरे नाव सध्यातरी पक्षात नाही. मेघे हे गडकरी समर्थक मानले जात असले तरी त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही तेवढेच सलोख्याचे संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले फेटरी गाव हे त्यांच्याच मतदारसंघात आहे. ग्रामपंचायतींपासून नगरपंचायतीपर्यंत सर्वच प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. पक्ष सत्तेत असल्याने कार्यकर्त्यांचे जाळेही भक्कम आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना २५,९१९ चे मताधिक्य मिळवून दिले होते. ही जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे असली तरी २०१४ च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी २० हजार ५७३ मते घेतली होती. शिवाय राष्ट्रवादी दोन वेळा या मतदारसंघात पराभूत झाल्याने काँग्रेसकडून या जागेवर दावा केला जाऊ शकतो. पक्षाने घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी काँग्रेसकडून राऊत यांच्यासह मुजीब पठाण यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे काटोलचे माजी आमदार आशीष देशमख यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. ते भाजपसाठी तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. वंचित बहुजन आघाडी, बसपा यांच्याकडून सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.