येथील पोलीस मुख्यालयातील आर्मर विभागत कार्यरत असलेल्या एका पोलीस जमादाराने स्वतःवर गोळी झा़डून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि.२०) दुपारी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे हिंगोली पोलीस दलात खळबळ उडाली असून या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्‍च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जितेंद्र साळी (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या जमादाराचे नाव आहे. पोलीस मुख्यालयातील आर्मर विभागात जमादार (शस्त्र दुरुस्ती) म्हणून ते काही दिवसांपासून कार्यरत होते. शनिवारी दुपारी ते विभागात कामासाठी आले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी कार्यालयातच एसएलआर रायफलने हनुवटी खाली गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी उडाल्याचा मोठा आवाज आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे साळी यांच्या चेहऱ्याचा बाग छिन्नविछन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृत जितेंद्र साळी हे मुळचे कळमनुरी येथील रहिवासी आहेत. सन २००१ मध्ये हिंगोली पोलीस दलात ते भरती झाले होते. त्यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात काम केले आहे. त्यानंतर त्यांची नियुक्ती अर्मर विभागात करण्यात आली होती.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक रामेश्‍वर वैंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडारवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, “या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांच्या आत्महत्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कौटुंबिक वादातून त्यांनी हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट कळते. मात्र, या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल,” अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी दिली.