पुण्यातील हिंजवडी बलात्कार प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच शिल्लक नसून शाळेत जाणा-या मुलीही सुरक्षित नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही, असे मुंडे यांनी म्हटले आहे. कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी ऊसतोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना रविवारी घडली होती. यातील एका मुलीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम गणेश निकम (वय २२) याला अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने हिंजवडीत संतापाची लाट उसळली आहे. हिंजवडीतील बलात्कार प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हिंजवडीतील ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना संतापजनक आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच शिल्लक नसून शाळेत जाणा-या मुलीही सुरक्षित नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. कुठे आहेत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा आणि कुठे आहे महामंडळ? असा सवाल त्यांनी विचारला. ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, तसेच या पीडित कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करावी. ऊसतोड कामगारांचे प्रश्न,त्यांच्या समस्या आणि कायदा व सुव्यवस्था याबाबत मी सरकारला आगामी अधिवेशनात जाब विचारेल, असेही त्यांनी म्हटले आहे.