डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ग्रामपंचायतीकडे तक्रारी डहाणू : डहाणू तालुक्यातील सास्वंद येथील ‘वेदांता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’च्या आवारात पुरलेला जैविक कचरा पावसाच्या पाण्यात पसरल्याने शेती आणि रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. वेदांता रुग्णालयात करोना विलगीकरण केंद्र आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जैविक कचरा एकत्र करून वाहनातून बाहेर नेला जात असल्याची माहिती ‘वेदांता हॉस्पिटल’चे डॉ. मुकुंद खंडेलवाल यांनी दिली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत वेदांता वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र आहे. या केंद्रात विविध प्रयोग, औषधे, तसेच जैविक कचरा जमा होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणे बंधनकारक असताना रुग्णालयासमोरील जागेत ‘सेप्टीक टँक’मध्ये कचरा साठवला जातो. मात्र, जोरदार पावसात जैविक कचरा शेतात इतरत्र पसरला आहे. रसायनमिश्रित पाणी शेतीत पसरले आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. वेदांत रुग्णालय परिसरात औषधालय तसेच कचऱ्यासाठीचे खड्डे खणून गाडले जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. रमेश लक्षी धामोडा रा. पुंजावे, गणपत धर्मा धामोडे रा. धुंदलवाडी, गणपत भिकला माढा रा.सास्वंद ,अनिल काशीनाथ भसरा धुंदलवाडी यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र शेतकरी आणि रहिवाशांच्या तक्रारीकडे प्रशासन काणाडोळा करीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते वसंत भसरा यांनी तक्रारीत म्हटले आहे. यंदाच्या पावसाळ्यात शेतीतआलेले जैविक कचऱ्याचे लगदे हाताने उचलून दूर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे सास्वंद खुलातपाडा येथील लक्ष्मी लाथड हिने सांगितले. बांधावर टाकलेले लगदे पुन्हा शेतात पसरून दुर्गंधी पसरल्याने आरोग्याची समस्या भेडसावू लागल्या आहेत. सास्वंद ग्रामपंचायत तसेच महसूल अधिकाऱ्यांकडे याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचनामे करण्यात आले. मात्र, त्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही. घातक रासायनिक, जैविक कचऱ्याची साठवणूक बंद करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रुग्णालयता जमा होणारा जैविक कचरा वाहनातून बाहेर नेला जातो. त्यामुळे तो साठवण्याचा प्रश्न नाही. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील त्यांच्याशी संवाद साधून त्याचे निवारण करण्यात येईल. -डॉ. मुकुंद खंडेलवाल, वेदांता हॉस्पिटल धुंदलवाडी