राज्यात सध्या थंडी व गारठा अशा दोन्ही प्रकारच्या हवामानाचा अनुभव नागरिकांना मिळत असून, दिवसा तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे जात आहे. तर, रात्री सरासरीच्याही खाली येत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा चटके, तर रात्री गारठय़ाचा अनुभव येत आहे. मंगळवारी पुण्यात कमाल तापमान ३४.१ अंश, तर किमान तापमान १०.६ अंश नोंदले गेले. ही परिस्थिती काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही शहरात तापमान पस्तीशीवर, तर काही ठिकाणी चाळीसजवळ पोहचले आहे. त्यामुळे दुपारी उकाडा जाणवत आहे. मात्र, रात्र होताच नागरिकांना हिवाळ्यातील थंडीसारखा गारवा जाणवत आहे. कमाल व किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. गेल्या चोवीस तासात कोकण-गोवा परिसरात दिवसाच्या तापमानाने चाळिशी ओलांडली. कोकणात भीरा येथे कमाल तापमान ४१ अंश नोंदले गेले, तर राज्यात किमान तापमान पुण्यात सर्वात कमी १० अंश नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी नोंदले जात आहे.
राज्यातील कमाल व किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये)- पुणे ३४ व १०.६, जळगाव ३५.२ व १४.५, मालेगाव ३८.१ व १३.४, मुंबई ३७.५ व २२, औरंगाबाद ३५ व १५.९, नागपूर ३५.६ व १४.