प्रखर राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ रोवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर माफीवीर कसे, असा प्रश्न उपस्थित करित अभिनेते प्रा.योगेश सोमन यांनी एकपात्री अभिनयातून सावरकरांचा संपूर्ण जीवनपट रसिकश्रोत्यांसमोर सादर केला. तर लोककल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच सत्याचा बाजूने निवाडे केले, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. भारतीय सद्विचार प्रसारक मंडळ व नगर रा.स्व.संघ, चंद्रपूरच्या वतीने माधवराव सदाशिवराव गोळवलकर उपाख्य गोळवलकर गुरूजी यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शिनी सभागृहात प्रा. सोमन यांनी सावरकर यांच्यावर एकपात्री प्रयोग तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान सादर करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, सद्विचार मंडळाचे संदिप पोशेट्टीवार, अॅड.रवींद्र भागवत, महापौर राखी कंचर्लावार,डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार, वसंतराव थोटे उपस्थित होते. पहिल्या दिवशी प्रा.सोमन यांनी रसिकमनाचा वेध घेत सावरकर यांचे बालपण, त्यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी, स्वातंत्र्य लढय़ातील योगदान, त्यांनी भोगलेली अंदमानची काळय़ापाण्याची शिक्षा असा संघर्षमय प्रवास मांडला. तसेच सावरकरांचे साहित्य, मातृभूमीला उद्देशू सागरा प्राण तळमळला हे काव्य अभिनयाद्वारे जिवंतपणे मांडले. प्रा. सोमन यांनी सावरकरांच्या अंगी प्रखर राष्ट्रवाद कसा ठासून भरला होता याची माहिती दिली. असा प्रखर राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ रोवणारा स्वातंत्र्यवीर माफीवीर कसा असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. दुसऱ्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यानात प्रा. सोमन यांनी शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हिंदू धर्मात शुध्दीकरणाची भूमिका मांडली. तेव्हा बाहेर जाणाऱ्यांसाठी हिंदू धर्माची कवाडे सताड उघडी असायची. पण आत येण्यासाठी बंद असायची. महाराजांनी या परंपरेला छेद दिला. या दोन्ही कार्यक्रमांना मोठय़ा प्रमाणात रसिकश्रोत्यांची गर्दी होती.