प्रशांत देशमुख

मुंबईतून गोरखपूरला निघालेल्या मजुरांच्या ट्रकमधील दोघांना करोनाच्या संशयातून वाटेतच उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यातील आजारी असलेल्या एका वृध्द व्यक्तीला वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकारामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे, मुंबईतून १७ मजूर एका ट्रकने आपल्या गावाकडे निघाले होते. त्यापैकी शांताराम यादव (वय ८०) व रामसुमेर काशीलाल यादव (वय ५२, दोघेही गोरखपूर) यांची प्रकृती प्रवासातच बिघडली. त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. ते पाहून ट्रकचालक व अन्य मजुरांनी या दोघांना ट्रकमधून खाली उतरवयाचे ठरवले. कारंजा (घाडगे) लगत सारवाडी येथील अनुष्का धाब्याजवळ एका झाडाखाली त्यांना उतरविण्यात आले. यावेळी पहाटेचे दोन वाजले होते. एकांतात पडून असतांनाच कोणतेही उपचार न मिळाल्याने शांतालाल यादव या वृध्दाचा तडफडून मृत्यू झाला. त्याचवेळी रामसुमेर हासुध्दा अत्यवस्थ होता.
सकाळी या घटनेची माहिती डॉ. सचिन इंगळे यांना माहिती झाल्यावर त्यांनी सारवाडीच्या आरोग्य केंद्राला याची माहिती दिली. प्राथमिक उपचारानंतर रामसुमेर यांना रूग्णवाहिकेतून वर्धेच्या रूग्णालयात पाठविण्यात आले. तर मृत शांतालाल यांच्यावर सरपंच व अन्य गावकऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या सूचनेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. करोनाच्या भीतीपोटी माणुसकी कलंकीत होण्याचे हे उदाहरण हळहळ व्यक्त करणारे ठरत आहे.