नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर रिकाम्या हाताने परतलेल्या आठ हजार खलाशांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पैसेच हाती नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न खलाशांसह त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

नारळीपौर्णिमा सण पार पडल्यानंतर पालघर जिल्ह्यतील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, तालुक्यातील आदिवासी मजूर गुजरातमधील वेरावळ, सौराष्ट्र, मंगळूरु, कच्छ, ओखा  बंदरातील  मच्छीमार बोटीवर कामासाठी स्थलांतर करतात. तेथे जवळपास आठ महिने ते असतात.

प्रतिखलाशी महिना सात ते आठ हजार तसेच १० हजार रुपयांपर्यंत त्यांना तेथे पगार मिळतो. कालावधी संपल्यानंतर खलाशांना एकूण पगार दिला जातो. त्यामुळे या पैशातून घर बांधणे किंवा इतर खर्च करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. एकाच कुटुंबातील  दोन ते तीन सदस्य खलाशी म्हणून येथे काम करताना दिसतात. यावेळी अचानक करोनाचे संकट उद्भवल्याने या खलाशांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. घरी परतण्यासाठी प्रतिखलाशांना २ हजार ५०० रुपये मोजावे लागले.  बोट मालकाने केवळ प्रवास भाडेखर्च देऊन खलाशांना घरी पाठवले आहे.  त्यामुळे पावसाळ्यातील शेतीचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.

आज त्यांचा अलगीकरणाचा कालावधी संपला आहे.  ते घरी परतले, पण हाताला काम नाही. त्यामुळे बेरोजगारीसह उपासमारी आहे. ज्याच्याकडे शेती आहे ते  शेतीकडे वळले. पण इतरांचे काय, त्यांना कामे नाहीत त्यामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे, याकडे  महेंद्र वाडकर या खलाशाने  लक्ष वेधले आहे.