कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाहीत याचा अभिमान वाटतो असे वक्तव्य लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले आहे. कोकणाताली माणसं कष्टकरी आहेत, ते गरीबीत दिवस काढतील मात्र आत्महत्या करणार नाहीत. परिस्थितीवर मात करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसात आहे याचा मला अभिमान आहे असेही सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. कोकणातील गुहागरमध्ये असलेल्या व्याडेश्वर मंदिरात सुमित्रा महाजन दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. कोकणातल्या तरूणांनी आता पुढे येत काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणचा विकास करायचा असेल तर सर्व पक्ष, जाती-भेद बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या. त्यासाठी देशाच्या पातळीवर जे सहकार्य लागेल ते देण्यास मी तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुका जवळ आल्या असल्या तरीही मी येणाऱ्या सरकारच्या काळातही कोकणाच्या विकासासाठी निश्चित प्रयत्न करेन असंही महाजन यांनी म्हटलं आहे. मी इंदूरमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा दळणवळण फार कमी होते. आपल्या राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला देशाशी जोडायचे असेल तर वाहतूक व्यवस्था खूप महत्त्वाची आहे. इंदूरमध्ये रेल्वे, हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत सर्वात महत्त्वाचे निर्णय मी दळणवळणाच्या बाबतीत घेतले आहेत असंही त्या म्हटल्या.