नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली. तसंच पुरुषी अत्याचाराचा उल्लेख महिलांनी नक्की करावा पण हा आरोप तेव्हाच करायचा दहा वर्षांनी नाही असंही राज ठाकरे म्हणाले. अमरावती येथील अंबा फेस्टिव्हल ट्रस्टच्या वतीने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्याालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.

चित्रपट सृष्टीमध्ये असं काही घडत असेल तर तेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले यांना त्रास झाला नसेल का?, १५ वर्षांची असतांना मी चित्रपट सृष्टीत आले तेव्हा एका कवीने त्यांना त्रास दिला डायरेक्टरने त्याला तेव्हाच काढले असे लता मंगेशकर यांनी माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

‘मी-टू’च्या माध्यमातून आज जे वातावरण पेटवले जात आहे, त्यातून या प्रकरणातील गांभीर्य निघून जाण्याचा धोका आहे. या अतिशय संवेदनशील विषयाची चेष्टा व्हायला नको, असे आपले मत आहे. नाना पाटेकर आपले मित्र आहेत, कधी-कधी ते उद्धटपणा करतात, पण त्यांनी तनुश्री दत्तासोबत गैरवर्तणूक केली, असे आपल्याला वाटत नाही. या प्रकरणात माध्यमांनी ‘ट्रायल’ घेऊ नये. आपली न्यायालये अशी प्रकरणे हाताळण्यात सक्षम आहेत. कोण दोषी ते न्यायालयांना ठरवू द्याा, असे राज ठाकरे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. रुपयाचे अवमूल्यन, इंधन दरवाढीमुळे भडकलेली महागाई यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या ‘मी-टू’ मोहिमेचा उपयोग केला जात आहे. सत्ताधारी भाजप काहीही करू शकते, असा टोमणा त्यांनी मारला.

राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही टीका केली. शिवसेनेला अजून त्यांची भूमिकाच समजलेली नाही. पैशांची कामे असली की सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी द्याायची आणि नसली की ती मागे घ्यायची, असे शिवसेनेचे चालले आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचे त्यांचे इशारे हास्यास्पद ठरू लागले आहेत. आता उद्याा दसरा मेळाव्यात हेच पुन्हा ऐकायला मिळू शकते, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला.