अनेक ठिकाणी उदघाटनाच्या कार्यक्रमाला गेल्यावर नव्या प्रकल्पाची नीट पाहणी येत नाहीत. लगेचच लोकांचे मोबाईल पुढे येतात, त्यामुळे मी राष्ट्रपतींना भेटून मला एक खून माफ करण्याची विनंती करणार आहे. मला मोबाईल निर्माण करणाऱ्याचाच खून करायचा आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईलवेड्यांवर तिरकस बाण मारला. त्यामुळे कार्यक्रम ठिकाणी एकच हशा पिकला.

पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या प्रभागातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान आणि मोरे बागेचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेवक किशोर शिंदे, रुपाली पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

राज म्हणाले, प्रत्येक शहरात मनसेच्या नगरसेवकांनी चांगली कामे केली आणि करीत आहेत. पण कामाला मतदान होते का? हाच मला प्रश्न पडला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणुका आल्या की थापा मारल्या जातात. मग कशाला कुणी कामं करेल, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

सध्या राज्यात प्लास्टिक बंदीवरून चर्चा सुरू आहे. त्याबाबत माझ्या नगरसेवकांनी सात वर्षांपूर्वी त्यावर उपाय योजना करण्यास सुरुवात केली. चांगल्या प्रकारे कचरा प्रकल्प उभारून नागरिकांची कचरा समस्येतून सुटका केली. एवढी कामे करून देखील कामाला मतदान होते का? हाच मला प्रश्न पडला आहे. जर आम्हाला मतदान होणार नसेल तर काम का कराव? असा मुद्दा राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.