अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नाही तर आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभवाची धूळ चारू अशीही गर्जना त्यांनी केली. रावसाहेब दानवे यांनी दीड वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा साले असे म्हणत त्यांच्यावर शेरेबाजी केली होती. त्याचीही आठवण कडू यांनी करून दिली. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. जालन्यातून आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करतानाच बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवेंवर कडाडून टीका केली. रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट आहे. तिथे रेती तस्करी चालते, बेकायदा दारू विक्रीमध्ये रावसाहेब दानवेंचा सहभाग आहे असाही आरोप कडू यांनी केला. लोकसभा निवडणुका समोर आहेत, अशात आपण जालना मतदार संघातून लढण्याची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत रावसाहेब दानवे पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.