अनंत गीते यांचे प्रतिपादन

नोटाबंदीमुळे देशभर अराजकतेचं वातावरण आहे. काळ्या पशासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरल्याने सामान्य नागरिकांची ससेहोलपट होते आहे. ही अराजकता आणखी वाढल्यास आपण तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सोमवारी येथे सांगितले.  दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सरकारचे निर्णय पटत नसल्यास सत्तेतून दूर व्हा, असे जाहीर आवाहन भाजपने शिवसेनेला केले होते. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्री अनंत गीते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वाचे लक्ष होते. या प्रचार सभेला पालकमंत्री रिवद्र वायकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, युवा नेते योगेश कदम, संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम आदी मान्यवर उपस्थित होते. मुळात शिवसेना सत्तेत सामील आहे. असे असले तरी आम्ही नोटाबंदीबाबत सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. यापूर्वी कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झाले होते, आता सर्व सामान्य नागरिकांवरदेखील ही वेळ येऊन ठेपली आहे. मुळात याचा परिणाम निवडणूक निकालावर कसा होईल, याचा अंदाज कोणालाही नाही. पण निवडणुकीत या निर्णयाविरोधात असंतोषाचा कौल द्यायचाच असेल, तर तो शिवसेनेच्या नव्हे तर भाजपच्या पारडय़ात टाकावा, असे आवाहनही गीते यांनी केले.

मुळात सर्व यंत्रणांना काळा पसा कोणाकडे आहे, याची माहिती आहे. पण त्यांच्यावर थेट कारवाई करण्याऐवजी भाजप सरकारने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. या निर्णयामुळे ८५ टक्के चलन बाद झाले आहे. उर्वरित १५ टक्के चलन शंभर रूपयांपर्यंतचे आहे. त्यामुळे सुरूवातीला दोन हजार रूपयांच्या नोटा काढूनही त्यांचे सुट्टे मिळणार कसे, याचा अभ्यास यंत्रणेने केलाच नव्हता काय, असा सवाल करत गीते यांनी या निर्णयाद्वारे संपूर्ण देशवासियांना चोर ठरवू नका, असा इशाराही दिला.