इचलकरंजी येथील संजय तेलनाडे व सुनिल तेलनाडे यांच्या 'एस. टी. सरकार' टोळीवर मंगळवारी पुणे येथील विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, हाणामारी, भू-माफिया असे विविध प्रकाराचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. संजय तेलनाडे हा महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील प्रमुख मटका बुकी म्हणून ओळखला जातो. तसेच ‘एस. टी. सरकार या गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही आहे. मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये नगरसेवक संजय तेलनाडे, सुनिल तेलनाडे, अॅड. पवन उपाध्ये, ऋषिकेश शिंदे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, अरिफ कलावंत, अभिजित जामदार, संदेश कापसे, देशभूषण उपाध्ये व राहुल चव्हाण यांचा समावेश आहे. यापैकी सहाजणांना अटक करण्यात आली असून तेलनाडे बंधूंसह ७ जण फरारी आहेत,अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली. शहापूर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हयातील आरोपींनी एस. टी. सरकार गँग नावाची संघटीत गुन्हेगारी संघटना काढल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ मधील काही वाढीव कलमे लावण्यासाठी मंजुरी मिळण्यासाठी तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक,कोल्हापूर परिक्षेत्र यांना प्रस्ताव सादर केला असता त्यांनी यास मंजुरी दिली होती. या गुन्हयाचा पुढील तपास.पोलीस बिरादार यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी गुन्हयाचा परिपूर्ण तपास करुन यातील आरोपींविरुध्द सबळ पुरावा प्राप्त केले होते. आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केलेचे तपासात निष्पन्न झाल्याने मोका कायदा कलम २३ (२) अन्वये मंजुरी मिळण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचेमार्फत प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक यांना सादर केला होता. त्याप्रमाणे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचेकडून दोषारोप पत्र दाखल करण्यास मंजुरी प्राप्त झाल्याने एस.टी.सरकार गँग विरुध्द मोका न्यायालयात मंगळवारी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.