केंद्र सरकारच्या संसद आदर्श गाव योजनेसाठी माढय़ाचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील तुळशी गावाची निवड केली आहे. सततच्या दुष्काळामुळे सर्वच पातळ्यांवर हे गाव मागासले आहे. त्यामुळेच या गावाचा संपूर्णत: कायापालट करण्याच्या हेतूने तुळशी गावाची निवड केल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले. माढा व पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तुळशी गावाला कायम दुष्काळाशी सामना करावा करावा लागतो. सुमारे एक हजार उंबरे आणि चार हचार ९०१ एवढी लोकसंख्या असलेल्या या गावात आतापर्यंत सिंचनाची कोणतीही योजना आली नाही. गावालगतच्या तलावातील पाणी कसेबसे दोन-तीन महिन्यांपुरतेच उपलब्ध होते. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. उदरनिर्वाहासाठी गावकऱ्यांनी दुग्धव्यवसायाचा मार्ग पत्करला असून नोकरी तथा मजुरीसाठी प्रत्येक घरातून एक-दोन व्यक्ती स्थलांतरित झाल्या आहेत.या गावात जलसंधारणाची कामे घेतल्यास सुबत्ता येऊ शकते. तसेच आरोग्य, शिक्षण, रस्ते, दिवाबत्ती आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास या गावात भरपूर वाव आहे. म्हणूनच संपूर्ण कायापालट होण्यासाठी तुळशी गावाची निवड केल्याचे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले. संसद आदर्श गाव योजनेसाठी संतांची भूमी असलेल्या तुळशी गावाची निवड खासदार मोहिते-पाटील यांनी केल्याबद्दल गावचे सरपंच डॉ. शरद मोरे यांनी समाधान व्यक्त केले. सदैव दुष्काळाने ग्रासलेल्या या गावाला आता प्रगतीची दिशा मिळेल. त्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांचेही सहकार्य मिळेल, असे त्यांनी नमूद केले.