राज्यापेक्षा आपण दिल्लीच्या राजकारणात राहण्यास उत्सुक असून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार लढणार नसतील तर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करू, असे रिपाइं नेते रामदास आठवले यांनी चिंचवडला पत्रकार परिषदेत सांगितले. महायुतीत मनसेच्या समावेशासाठी गोपीनाथ मुंडे आग्रही असले तरी उद्धव ठाकरे व आपली भूमिकाही महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांनी स्वत:हून तसा प्रस्ताव दिल्यास याबाबतचा विचार होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुका आधी होणार आहेत. मुंबई, शिर्डी व माढय़ातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे. शिर्डीत पुन्हा जाण्याचा विचार नाही. मात्र, माढय़ात शरद पवार नसतील तर तेथे लढू. अन्यथा, राज्यसभेच्या पर्यायाचा विचार करू. मायावतीने उत्तर प्रदेशात राबवलेला ‘सोशल इंजिनिअिरग’ चा फॉम्र्युला आपण महाराष्ट्रात राबवू व यशस्वी करू, असे ते म्हणाले. मराठय़ांना व ब्राह्मणांना आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. फेब्रुवारीत होणाऱ्या मराठा आरक्षण हक्क परिषदेसाठी सर्व प्रमुख मराठा नेत्यांना बोलावण्यात येणार आहे. सत्तेत मराठा मुख्यमंत्री, मंत्री व आमदार असतानाही आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, कारण मराठा समाजाकडून व संघटनांकडून आरक्षणाची फक्त मागणी होते. त्यासाठी आवश्यक तीव्र आंदोलने होत नाहीत. मराठय़ांना लढावे लागेल, त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आठवले व रिपाइं त्यांच्यासोबत राहील, असे ते म्हणाले.
स्वतंत्र तेलंगणाची मागणी होत आहे, त्याचा विचार करत असतानाच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा विचार व्हावा. अविकसित राहिलेल्या विदर्भाच्या माध्यमातून दुसरे मराठी भाषक राज्य होत असल्यास रिपाइंचा पािठबा असेल. औद्योगिक विकासाला विरोध नसला तरी मोठय़ा सेझला आमचा तीव्र विरोध आहे. छोटय़ा प्रमाणात सेझ असावे, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, अशी आमची भूमिका आहे. रिपाइं नेते एकत्र येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ऐक्याला विरोध नाही. चार-पाच वेळा आपणही प्रयत्न केले. मात्र नेत्यांमध्ये ऐक्य करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कार्यकर्त्यांमधील ऐक्य महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.