वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. राज्यात आमची सत्ता आल्यास संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू असे त्यांनी म्हटले आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, नुकतीच एक बातमी होती की बिहारमधील एका खासदाराकडे AK-47 रायफल सापडल्याने त्याला तुरुंगात जावं लागलं. मोहन भागवतांकडेही AK-47 रायफल आहे. ही रायफल त्यांच्याकडे कशी आली याचे उत्तर जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांनाही तुरुंगात जाव लागेल. हा या देशाचा कायदा आहे जो कायदा देशातील सर्वसामान्य जनतेला लागू होतो तोच संघाच्या नेत्यांनाही लागू झाला पाहिजे, असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी काँग्रेसवरही प्रकाश आंबेडकर यांनी शरसंधान साधले. लोकसभेसाठी आपण अनेकदा काँग्रेसकडे त्यांनी हरलेल्या जागा मागितल्या होत्या. मात्र, काँग्रेसने या जागा देण्यास नकार देत धर्मनिरपेक्ष मतं दाबून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.