बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे आम्हाला प्रेरणा मिळायची. त्यांची नागपूरला सभा होणार म्हटल्यानंतर सभेच्या ४ दिवस आधी आणि सभेच्या ४ दिवस नंतर आम्ही त्यावर चर्चा करत असत, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. त्यावेळी आम्ही खूप छोटे कार्यकर्ते होतो. त्यावेळी मातोश्रीच्या बाहेर जरी उभा राहायला मिळालं तरी भारी वाटायचं, असेही फडणवीस यांनी सांगितले.

‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेबांची नागपूरच्या सभेची मला खूप उत्सुकता असायची. निवडणूक जिंकू किंवा हरू पण त्यांच्या भाषणाने चैतन्य निर्माण होत असत. मी त्यावेळी खूप छोटा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्यांची भेट मिळण्याची कोणतीच शक्यता नव्हती, असे ते म्हणाले.

१९९५ मध्ये जर शिवसेना-भाजपा युती झाली नसती तर आम्ही इथंपर्यंत पोहोचलोही नसतो, असे फडणवीस यांनी खुल्या मनाने सांगितले. त्यावेळी युतीच्या काय चर्चा व्हायच्या माहीत नव्हत्या. त्यावेळी ‘मातोश्री’च्या बाहेर जरी उभा राहायला मिळालं तरी आम्हाला भारी वाटायचं, असेही ते म्हणाले.

९५ च्या युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘रिमोट कंट्रोल’विषयी मोठी चर्चा होती. याविषयी ठाकरे चित्रपटाचे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी आज ‘रिमोट कंट्रोल’ असता तर काय झालं असतं, असा प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी क्षणाचाही वेळ न घेता ‘फार आनंद झाला असता’ असे उत्तर दिले.