मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे आज जनतेशी संवाद साधला. आपला महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात करोनाशी दोन हात करण्यासाठी कोणत्याही लष्कराची गरज नाही. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. करोनासोबतची लढाई आपण सगळे एकजुटीने जिंकणार आहोत असाही विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आपण पाहुया त्यांच्या भाषणातले ठळक मुद्दे. मुंबईत लष्कर येणार ही अफवा, जे करेन ते तुम्हाला सांगून करेल, मुंबईत लष्कराची गरज नाही, ते मुंबईत येणार नाही. संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे, सर्व उपाययोजना करत आहोत. बीकेसीमध्ये कोव्हिड रुग्णालय उभं राहात आहे, ते दुपटीने वाढवू, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करु. सर्व यंत्रणा तणावाखाली आहेत, पोलीस यंत्रणेतील अनेकजण आजारी पडले, काहींचा मृत्यू झाला, त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे, सर्व यंत्रणांवर ताण आहे, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत, त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर केंद्राकडून मागू, पण त्याचा अर्थ लष्कर बोलवू असं नाही. बाहेरच्या राज्यातील आपल्या लोकांना आणणार आहोत, पण सर्व काही मोजून मापून करणार आहोत, रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही केसेस सापडत आहेत, तिथे शिथिलता इतक्यात शक्य नाही, लॉकडाउन हा गतीरोधक आहे, पण चेन तोडायला अद्याप यश नाही. लॉकडाउन कितीवेळा वाढवायचा? आपल्याला चेन तोडण्यात यश आलेलं नाही, ते यश मिळवायचं आहे. पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून अधिकच्या मनुष्यबळाची मागणी करणार, नंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने पोलिसांना तैनात करु, याचा अर्थ लष्कर बोलावलं असा नाही. मुंबईतील टेस्ट सुरुच राहतील, राज्यात सर्वाधिक टेस्ट होत आहेत, शेवटच्या टप्प्यात रुग्ण आल्यावर उपाय कमी पडतात. करोनाची साखळी तोडण्याची वेळ आहे, अनेक रुग्ण उशिराने समोर येत आहेत, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील तर स्वतःहून पुढे येऊन तपासणी करा, घाबरु नका. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच, पण बरे होणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे, सव्वातीन हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. औरंगाबादची दुर्घटना अत्यंत वेदनादायी, मजुरांनी संयम बाळगावा. रुग्णालयांमध्ये गलथानपणा चालणार नाही, आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका, सर्व व्यवस्थित असताना गलथानपणा चालणार नाही. मी आयुष डॉक्टरांनाही आवाहन करतोय, त्यांनी मदतीसाठी पुढे यावं, तुम्हा सर्वांची महाराष्ट्राला गरज आहे. आयुर्वेदीक डॉक्टरांनीही सहभागी व्हावं. लॉकडाउन वाढवण्यात कुणाला रस नाही, पण प्रत्येकाने शिस्त राखणं आवश्यक आहे, माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे. आपल्याला सामाजिक अंतर ठेवायचं नाही, तर शारिरीक अंतर ठेवायचं आहे, म्हणूनच मी फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला