केवळ ५० दिवसांत उजनी धरणात तब्बल १०२ टक्के  एवढा जलसाठा जमा झाला असून १५० टक्के भरण्याचे आव्हान येत्या काही दिवसात सहजपणे पेलले जाण्याची चिन्हे आहेत. या धरणातील वजा ५० टक्के पाणीसाठा ओलांडल्यानंतर लगेचच गेल्या आठवडाभरात धरणात उपयुक्त पाण्याचा साठा ५२ टक्क्य़ांच्यावर पोहोचला आहे. ११७ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या या धरणात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा राखताना तो ९० टीएमसीपेक्षा जास्त झाल्याचे दिसून आले.
सायंकाळी सहापर्यंत उजनी धरणातील पाण्याची पातळी ४९४.४२७ मीटर तर एकूण पाणीसाठा २५९१.५७ दशलक्ष घनमीटर आणि उपयुक्त पाणीसाठा ७८८.७६ दलघर्मीपत पोहोचला होता. धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ४३ हजार १३१ क्युसेक्स तर त्या तुलनेने बंडगार्डन येथून मिसळणारा पाण्याचा विसर्ग कमी होऊन १३ हजार ८३० क्युसेक्सपर्यंत होता.