मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. महाड तालुक्यातील वीर गावाच्या हद्दीमध्ये शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास झालेल्या अपघातात चार जण ठार, तर २३ जण जखमी झाले आहेत. महाडजवळील वीर येथे ट्रक आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईला पाठविण्यात आले असल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली.
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या जॉली ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला  मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या ट्रकने  जोरदार धडक दिली.  ही धडक एवढी प्रचंड होती की, त्यामुळे ट्रकचे सर्व भाग रस्त्यावर पसरले गेले, तर लक्झरी बसच्या चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. या भीषण अपघातामध्ये ट्रकचालक चेतन प्रकाश भोसले (२१),  प्रकाश बुद्धिराम विश्वकर्मा (२५), शिवानी बबन चव्हाण (२०), सर्व राहणार वालोपे, ता. चिपळूण आणि बसचा दुसरा चालक इसाक शाबा हुमानी (५२) मु. मडगाव, गोवा हे चार जण जागीच ठार झाले. या भीषण अपघातात २३ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारांकरिता त्वरित मुंबईमध्ये पाठविण्यात आले.