“एकीकीडे करोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसूली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसूली करायची आहे. म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे.” अशी टीका महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(मंगळवार) माध्यमांशी बोलताना केली. वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं, असं राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे, या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ही निशाणा साधला आहे.

वीजबिल थकबाकी वेळेत वसूल केली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं – नितीन राऊत

तसेच, “उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे सांगितलं, त्यातूनच हे लक्षात येतं की, त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. पणही जी काही थकबाकी आपण दाखवतो, याच्यामध्ये विशेषता कृषी पंपाच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपला तोटा आहे, हा भरून काढण्यासाठी आपल्याला जे टेरिफ मिळतं, त्यामधून हा तोटा आपण भरून काढतो. त्यामुळे मला असं वाटतं की, या ठिकाणी जबरदस्ती वसूली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येतोय.” असंही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं.

सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही –

याचबरोबर नुकतीच पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही हे यातून स्पष्ट झालेलं आहे.”

मुख्यमंत्र्यांनी कुंभकोणी यांना नियुक्त केलं आहे –

तसेच, “नाना पटोले जे बोलले आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांनी कुंभकोणी यांना नियुक्त केलं आहे. या सरकारने त्यांना पुन्हा नव्याने नियुक्त केलं आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही मुद्दे नाहीत –

“आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, ते बोली भाषेत बोललेले आहेत आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाणं हे योग्य नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे घेऊन ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.