२ वर्षांत ४८८ जणांचा मृत्यू तर ११६८ जखमी

रायगड जिल्ह्य़ात गेल्या दीड वर्षांत रस्ते अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. बेदरकार वाहनचालक, अरुंद रस्ते, अवजड वाहनांची वाढलेली संख्या हे घटक रस्ते अपघातांना कारणीभूत ठरत आहे. जिल्’ाात गेल्या दीड वर्षांत १ हजार ८५८ अपघातांची नोंद झाली आहे. यात ४८८ जणांचा बळी गेला तर १ हजार १६८ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.  रायगड जिल्’ाातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. यात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. पुण्याला जोडणाऱ्या दोन महामार्गाच्या तुलनेत मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. अरुंद रस्ता, महामार्ग रुंदीकरणाचे रखडलेले काम, रस्ता रुंदीकरणासाठी टाकण्यात आलेले वळण रस्ते, वाहनांची वाढलेली संख्या, चालकांचा आततायीपणा यामुळे या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे.

मुंबई -पुणे जुन्या महामार्गावर रायगड पोलीस दलाच्या हद्दीत २०१५ मध्ये १३६ अपघात झाले. यात ४९ जणांचा मृत्यू झाला. तर २७२ जण जखमी झाले. २०१६ मध्ये याच महामार्गावर एप्रिल अखेपर्यंत २९ अपघातांची नोंद झाली. यात १५ जण दगावले तर १२ जण गंभीररीत्या जखमी झाले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रायगड पोलीस दलाच्या हद्दीत २०१५ मध्ये २०३ अपघात झाले. यात ६३ जणांचा मृत्यू झाला, तर १२१ जण जखमी झाले. २०१६ मध्ये याच महामार्गावर एप्रिलअखेपर्यंत ५५ अपघातांची नोंद झाली. यात २४ जण दगावले तर १८ जण गंभीररीत्या जखमी झाले.  मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ते कशेडी हद्दीत २०१५ मध्ये ४९७ अपघात झाले. यात ९९ जणांचा मृत्यू झाला, तर ४६२ जण गंभीर जखमी झाले. २०१६ मध्ये याच महामार्गावर एप्रिल अखेपर्यंत १७४ अपघातांची नोंद झाली. यात ४८ जण दगावले तर १४७ जण गंभीररीत्या जखमी झाले. म्हणजेच गेल्या चार महिन्यात या महामार्गावरील अपघातात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे

रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे या महानगरांच्या जवळ असल्याने गेल्या दोन दशकात जिल्’ाात अनेक देशी-विदेशी कंपन्यांनी आपले उद्योग सुरू केले आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच पायाभूत सुविधांमध्ये वाढ न झाल्याने आता त्याचे दुष्परिणामही दिसण्यास सुरवात झाली आहे. जिल्’ाात औद्योगिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असली तरी त्या तुलनेत दळणवळणाचे मुख्य साधन असणारे रस्ते विकसित झालेले नाही. अरुंद रस्ते आणि वाढलेली अवजड वाहनांची संख्या यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.

आगामी काळात जिल्’ाात मुंबई दिल्ली कॉरीडोर, दिघी पोर्ट, नवी मुंबई विमानतळ,जेएनपीटीचे विस्तारीकरण यांच्यासह नवी मुंबई सेझसारखे प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांची संख्या आणखीन वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम सध्या संथगतीने सुरू आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील कामाचे भूसंपादन सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाची ही कामे तातडीने पूर्ण कशी होतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.