आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘भाजपला वीर सावरकरांचा खोटा पुळका आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?,’ असा सवाल शिवसेनेने आपल्या सामनाच्या संपादकीयमधून केला होता. त्यावर राणे यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

“बाळासाहेब होते का स्वतंत्र्य लढ्यात? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवली केली बाळासाहेबांनी. तो इतिहास लोकं विसरलेली नाही,” अशा आशयाचं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.


स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? १९४७ साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे, असं म्हणत शिवसेनेने तत्कालिन संघ परिवार आणि भाजपावर निशाणा साधला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ‘‘तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.’’ ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण २००२ पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगतेय असं शिवसेनेनं म्हटलं होतं.