पालघर, बोईसर आणि माहीम औद्योगिक वसाहतीतील कारखानदार हवालदिल

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : करोना काळात परराज्यातील पालघर जिल्ह्यात असलेले कुशल-अकुशल कामगार वर्ग तसेच मजुरांनी त्यांच्या मूळ गावी स्थलांतर सुरू केल्याने तसेच बहुतेक कारखाने बंद असल्यामुळे कामगार कपात केल्याचा फटका बसलेले लाखो कामगार पालघरमधून आपल्या राज्यात परतल्याने येथील लघु व मध्यम उद्य्ोगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये बोईसर रोड येथे पालघर तालुका औद्योगिक वसाहत तर माहीम ग्रामपंचायत हद्दीत बिडको औद्योगिक वसाहत आणि वेवूर येथे दिवाण उद्योग वसाहत तसेच इतरही लहानमोठय़ा वसाहती या क्षेत्रात असल्या तरी या क्षेत्रातील या कारखान्यांमधील कामगार कपातीचा फटका लघु व मध्यम उद्योगांना मोठय़ा प्रमाणावर बसला आहे. उत्पादन सुरू होण्याच्या ऐनवेळी हे कामगार  त्यांच्या राज्यात परतल्याने या वसाहतीतील कारखान्यांत  कामगारांअभावी उत्पादन होणार नसल्याने यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड या उद्योगांना सोसावा लागत आहे.

या औद्य्ोगिक वसाहतींत मोठय़ा प्रमाणावर परराज्यातील नागरिक विविध आस्थापनांवर काम करत होते.

त्यांच्यावरच हे बहुतांश उद्योग अवलंबून होते. या उद्य्ोगांमध्ये स्थानिक कामगार काम करत असले तरी या लघु व मध्यम उद्य्ोगांमधे बहुतांश अकुशल कामगार परराज्यातील होते. गेल्या तीन महिन्यापासून भेडसावत असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या परराज्यातील नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्याचे वेध लागले होते.

अशात शासनाने त्यांची परराज्यात जाण्याची सोय केली तसेच काहींनी खाजगीरित्या वाहने करून आपले गाव गाठले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणातील परराज्यातील काम करणाऱ्या कामगारांची संख्या येथे कमी झाली याचा थेट फटका  हजारो उद्य्ोगांना बसणार आहे.

काही हजारांत उत्पादन कसे घ्यायचे?

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत मोठे व लघु—मध्यम असे सुमारे ३३६६ पेक्षा जास्त उद्योग सुरू असून यामध्ये सुमारे ६२ हजार २६० कामगार कार्यरत आहेत तर पालघर जिल्ह्यातून आठ हजार २२१ अर्ज उद्योग सुरू करण्यासाठी औद्य्ोगिक विकास महामंडळाकडे प्राप्त झाले असून यामध्ये सुमारे ५,५०० उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. या ५,५०० उद्योगांमधून एक लाख २८ हजार कामगार काम करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातून सुमारे एक लाखहून अधिक परराज्यातील कामगार मूळ गावी परतले आहेत.

शासनाच्या स्वयंरोजगार केंद्रामार्फत, स्थानिक तरुण व प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधी यातून कामगारांची तूट भरून काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

-सतीश भामरे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र