उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पंढरपूरच्या आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारक -यांना तंबू किंवा राहुटय़ा उभारता येणार नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यायी सोय म्हणून नदीपलिकडील शासनाच्या ६५ एकर जागेत वारक-यांच्या निवा-याची सोय करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या जागेवरील अतिक्रमणे पाडून टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. चंद्रभागेच्या पात्रालगतच ६५ एकर शासकीय मैदान आहे. परंतु या मैदानावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यात झोपडय़ांसह दुकानांचा समावेश आहे. ही सर्व अतिक्रमणे सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार पाडून टाकण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. पंढरपूरचे सहायक नगर रचनाकार एस. आर. कुलकर्णी यांच्यासह पंढरपूर नगरपालिकेच्या पथकाने अतिक्रमणे पाडून टाकण्यास सुरुवात केली. प्रारंभी ही अतिक्रमणे पाडण्याच्या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला. परंतु संबंधितांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यासारख्या कठोर कारवाईचा बडगा दाखविताच हा विरोध मावळला. अतिक्रमणे हटविली जात असताना स्थानिक रहिवासी तसेच व्यापा-यांनी आपले जास्त नुकसान होऊ नये म्हणून स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. दोन दिवसांत संपूर्ण ६५ एकर क्षेत्राचे मैदान मोकळे झाले असून आता या मैदानावर साफसफाई केल्यानंतर त्याठिकाणी वारक -यांसाठी निवासाची सोय केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पंढरपुरात आषाढी यात्रा तोंडावर आली असताना परगावाहून येणारे यात्रेकरू ज्या खासगी मिळकतदारांकडे उतरतात, त्या मिळकतदारांनी यात्रेकरूंची माहितीची नोंद करून ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु या सूचनांचे उल्लंघन करून परस्पर यात्रेकरूंना निवारा उपलब्ध करून देणा-या सहा खासगी मिळकतदारांविरुद्ध पंढरपूर शहर पोलिसानी गुन्हे दाखल केले आहेत. खासगी मिळकतदारांसह मठ तसेच हॉटेल व लॉजेसमध्येही यात्रेकरूंची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात्रेच्या कालावधीत सुरक्षितता कायम राहण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.