डोंबिवलीत होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी शाई फेकल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. 'तुमचे पुरोगामी विचारांचे नाटक बंद करा, अन्यथा तुमचेच नाटक करु' अशी धमकी हल्लेखोरांनी दिल्याचा आरोप घुमटकरांनी केला आहे. डोंबिवलीमध्ये फेब्रुवारीत होणा-या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी सकाळी घुमटकर हे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीजवळून जात असताना दोन जणांनी त्यांच्यावर शाई फेकली. तुमचे पुरोगामी विचारांचे नाटक बंद करा अशी धमकी हल्लेखोरांनी दिली आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून घुमटकर यांनी परखड विचार मांडले आहेत. मराठी साहित्य महामंडळाची एकूण कार्यपद्धती संशयास्पद असून महामंडळात ‘विशिष्ट गटाची’ मक्तेदारी दिसून येत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये कसदार साहित्यनिर्मिती होत नसून सध्याचे साहित्यिक केवळ गुळमुळीत लिहिण्यावर भर देत आहेत. साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ असलेल्या रावसाहेब कसबे यांच्यासारख्या साहित्यिकांना हे पद सन्मानाने देण्यात आले असते तर आपण ही निवडणूक लढवली नसती, असे घुमटकर म्हणाले होते. घुमटकर यांना अशोक बागवेंनी पाठिंबा दिला आहे.