पश्चिम विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकरी हवालदिल नागपूर: कपाशीच्या बी टी बियाण्यावर बोंडअळीचा ९० दिवसांहून अधिक काळ प्रादुर्भाव होत नाही, हा कंपन्यांचा दावा यंदा फोल ठरला असून पश्चिम विदर्भ, मराठवाडा या कापूस पट्टय़ात हजारो हेक्टर पीक बोंडअळीमुळे ८० ते १०० टक्के उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून गेला. जे पीक शिल्लक होते ते खरेदीसाठी शासकीय केंद्रे सुरू झाली नाहीत, त्यामुळे पडलेल्या किमतीत शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्याशिवाय पर्याय नाही. अशातच कापसावर मदार होती. मात्र हे पीकसुद्धा बोंडअळीमुळे हातचे जाण्याची वेळ आली, असे पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी सांगतात. बोंडअळी हे कापसाचे संपूर्ण बोंड नष्ट करते. कोणत्याही फवारणीचा या अळीवर परिणाम होत नाही. परिणामी कापसाचे पीकच शेतकऱ्यांच्या हातून जाते. बी. टी. बियाणांची लागवड केली तर हा धोका नसतो, असे कृषी खाते व बी.टी. बियाणे विक्रेत्या कंपन्यांकडून दावा केला जातो. प्रत्यक्षात यंदा बी.टी.ची लागवड करूनही कापसावर बोंडअळ्या पडल्या आहेत, असे पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अमरावती आणि मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्य़ातील ४३२ हून अधिक शेतकऱ्यांनी कळवले आहे. बोंडअळी जर कपाशीच्या झाडांवर लवकर पडली तर ८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात कापसाच्या बीटी-१, बीटी-२ या बियाणांना परवानगी आहे, हे बियाणे काही कालावधीपर्यंतच बोंडअळीला रोखू शकतात. दुसरीकडे बोंडअळीची प्रतिकारशक्तीही वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक वेळा बी.टी. बियाणेही या अळीला रोखू शकत नाही, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे शेतक ऱ्यांनी घरगुती बियाणे वापरणे हाच एक पर्याय आहे, असे प्रगतशील शेतकरी व भारतीय किसान संघाचे नेते नाना आकरे यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे ७५ टक्के सोयाबीनचे नुकसान झाले. आता बोंडअळीमुळे कापसाचे पीक हातचे जाण्याचा धोका आहे. यामुळे पुढच्या काळात शेतकऱ्यांना विदारक स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. यवतमाळच्या सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाने पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वाशीम आणि मराठवाडय़ातील नांदेड जिल्ह्य़ातील विविध गावांतील शेतकऱ्यांशी चर्चा करून अतिवृष्टीमुळे झालेली सोयाबीनची पीकहानी तसेच बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांना बसलेल्या फटक्याचा अभ्यास केला. त्यात एकूण ४३२ शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. यात ६५ टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक होते. अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे आढळून आले. यंदा ५० टक्के शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. चर्चा झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ३९.३४ टक्के शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली होती. पश्चिम विदर्भातील मोठय़ा प्रमाणात कपाशीचे बी. टी. बियाणे वापरतात व एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च करतात. अळीला रोखण्यात अपयश ’बोंडअळी कापसाचे संपूर्ण बोंड नष्ट करते. कोणत्याही फवारणीचा या अळीवर परिणाम होत नाही. परिणामी कापसाचे पीकच शेतकऱ्यांच्या हातून जाते. ’बी. टी. बियाणांची लागवड केली तर हा धोका नसतो, असा दावा कृषी खाते आणि बी.टी. बियाणे विक्रेत्या कंपन्या करतात. ’प्रत्यक्षात यंदा बी.टी.ची लागवड करूनही कापसावर बोंडअळ्या पडल्या आहेत, असे ४३२ हून अधिक शेतकऱ्यांनी कळवले आहे. ’बोंडअळी जर कपाशीच्या झाडांवर लवकर पडली तर ८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ’बोंडअळीची प्रतिकारशक्तीही वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक वेळा बी.टी. बियाणेही या अळीला रोखू शकत नाही.