कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना जीव गमावणाऱ्या यवतमाळमधील १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पिकावरील किडींचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकाने शेतकरी आणि शेतमजुरांचा जीव घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ७५० शेतकऱ्यांवर उपचार सुरु असून २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळमधील घटनेची शेतकरी संघटनांनी दखल घेत राज्य सरकारकडे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मृत्यूला शासनाच्या कृषी आणि आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला होता. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कीटकनाशक फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. दरम्यान, कीटकनाशक फवारणी प्रकरण माध्यमांमध्ये झळकताच सरकारी यंत्रणांना खडबडून जाग आली. सोमवारी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा मृत्यू कशामुळे ? फवारणी करताना कीटनाशक शेतकऱ्यांच्या नाका-तोंडांत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना नाक, तोंडाला कापड बांधणे आवश्यक आहे. परंतु गरिबी, अज्ञान यामुळे हे याचे पालन होत नाही. विषारी कीटकनाशक वापरण्याबद्दलचे, हाताळण्याबद्दलचे अज्ञान, निष्काळजीपणा यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला.