जगभरात महिला दिन साजरा होत आहे. विविध उपक्रम आणि माध्यमांतून स्त्रीशक्तीविषयी आदर व्यक्त केला जात असून, सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून स्त्रीशक्तीच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना मोलाचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे यांनी महिला दिनानिमित्त ट्विट केलं आहे. “८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मूळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल, तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील.’ त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.,” असं राज यांनी म्हटलं आहे.

“मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही. राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही. तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता. बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा,” असं म्हणत राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.