रट्टा मारून शिकले की फारसे पुढे जाता येत नाही. शाळा मुलांच्या प्रगतीत अडथळा ठरू लागल्यासारखे वातावरण आहे. अनेकदा त्याचा अनुभव घेतल्याचे सांगत लेखक अनिल अवचट यांनी, आनंदी जगण्याची कला औरंगाबादकरांसमोर प्रकट मुलाखतीद्वारे मांडली. भूलशास्त्र दिनानिमित्त डॉ. सुहास जेवळीकर यांनी अवचट यांची मुलाखत घेतली.
वैद्यकीय व्यवसायात शल्यचिकित्सकापेक्षा महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या भूलतज्ज्ञास रुग्ण विसरतो. रुग्णाची व या तज्ज्ञाची ओळखही होत नाही. या शाखेचे महत्त्व कळावे, म्हणून दरवर्षी जनजागरण करण्याच्या उद्देशाने जाणकार व्यक्तीची प्रकट मुलाखत घेतली जाते. या वर्षी लेखक अनिल अवचट यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविला. ते म्हणाले, ‘‘तसा मी शाळेत फारसा चमकदार विद्यार्थी नव्हतो. पाठीमागच्या बाकावर बसून ‘ढ’ श्रेणीत मोडणारा विद्यार्थी होतो. पण पुढे जे वाटले ते लिहीत गेलो. बिहारमधील दुष्काळात केलेल्या कामामुळे कमालीचा अस्वस्थ झालो होतो. त्याचा आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. सामाजिक काम करताना बाबा आढाव यांच्या मदतीने एक जग अनुभवले. तळागाळातील माणसांचे अनुभव लिहीत गेलो.’’
मनस्वी जगण्याचा मंत्रच त्यांनी या वेळी औरंगाबादकरांना दिला. ओरिगामी, चित्रकला, गाणे, बासरी वाजविणे असे अनेक छंद कसे जोपासले, हे त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण आदींची उपस्थिती होती.