करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एक महत्वपूर्ण विधान केलं. करोनावरील लस येईल तेव्हा येईल, मात्र किमान पुढचे सहा महिने तरी मास्क वापरणं बंधनकारक असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील जनतेशी मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाइन संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले , “लॉकडाउनच्या काळानंतर आता गर्दी वाढू लागल्याने थंडीचे आजार काही प्रमाणात दिसू लागले आहेत. या सर्वांवर औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे. मास्क लावा, हात धुवा व सुरक्षित अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं, तर कोविडचं काय इतर कोणतेही साथीचे आजार, आपण जर त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवतील. आपल्या देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं की, करोनावरील लस आली तरी मास्क तुम्हाला लावावा लागणार आहे. म्हणजेच लस आतापर्यंत आलेली नाही परंतु लस येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्या पर्यंत पोहचेल तेव्हा पोहचेल. परंतु ते घेतलं तरी मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढील सहा महिने तरी आहेच.”

करोनावर लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं आवश्यक – केंद्रीय आरोग्य मंत्री

तर, “लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल हे येणाऱ्या काळातच निश्चित होईल. त्यामुळे मास्क लावणं तर सर्वात सोप आहे. म्हणून मास्क लावणं आणि हाताच्या स्वच्छतेवर लक्ष देणं हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. जर समजा लस आलीच नसती तरी आपल्याला हे करणं गरजेचंच होतं. त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क लावायला कधीही विसरु नका.” असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल व्यक्त केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क बंधनकारकर असल्याचं म्हटलं आहे.