दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणून देणं हे दुर्देवी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. कृषी कायद्यांविरोधात सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आक्रमक झाले असून दिल्लीच्या सीमेवर त्यांना रोखण्यात आलं असून इथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत.

राऊत म्हणाले, “कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला ज्या प्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आलं आहे. यावरुन असं वाटतं हे कोणी बाहेरुन आलेले शेतकरी आहेत देशातील नाहीत. त्यांना देण्यात आलेली वागणूक ही दहशतवाद्यांसारखी आहे. विशेषतः जे शीख आहेत आणि पंजाबमधून आले आहेत.”

“पंजाब आणि हरयाणातून आलेत म्हणून त्यांना विभाजनवादी, खलिस्तानवादी म्हणणं हा या देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ हा आहे की, आपण पुन्हा एकदा पंजाबमध्ये तोच काळ आणू इच्छिता, लोकांना आठवण करुन देऊ इच्छिता की आपण पुन्हा एकदा त्याच मार्गाने जावं, हे देशाच्या स्थिरतेसाठी चांगल नाही,” अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकावर हल्लाबोल केला.