राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची लगबग असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. बीड येथील जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्यावर असणारी कारवाईची टांगती तलवार आता दूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली होती. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आजच्या दिवशी घेण्याचं जाहीर केलं होतं. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले होते. अखेर आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने या प्रकरणी दोन आठवड्यांनंतरची तारीख दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. आणखी वाचा- शरद पवारांकडून महिला आयोगाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह; धनंजय मुंडेंना दर्शवला पाठींबा बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. कारखान्याच्या जमीन खरेदी करतेवेळी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली आहे. फड यांनी बर्दापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचं सांगत त्यांनी न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. दरम्यान, परळी मतदारसंघात मुंडे विरुद्ध मुंडे अशी बहिण-भावांमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर धनंजय मुंडे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपाच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांच्याविरोधात ते उभे ठाकले असून संपूर्ण राज्याचं या मतदारसंघकडे लक्ष लागून राहिलं आहे.