विजेच्या धक्क्यात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावात बुधवारी रात्री घडली. दिवसभर वीज नसल्यामुळे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या भावाला विजेचा धक्का लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वात मोठा भाऊ विवाहित होता. तर इतर दोघेही अविवाहित होते. या हृदयद्रावक घटनेमुळे पळसखेडा गावांवर शोककळा पसरली आहे.

ज्ञानेश्वर जाधव (२७ वर्ष), रामेश्वर जाधव (२५ वर्ष) आणि सुनील जाधव दुर्वेवी मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावं आहेत. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर जाधव विद्युत मोटार सुरु करत असाताना विजेचा शॉक लागल्यामुळे विहिरीत पडला. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या रामेश्वर आणि सुनील यांनाही विजेचा धक्का बसला अन् तेही विहिरीत पडले. विहिरीतही करंट उतरल्यामुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्यासह हसनाबादचे सहायक पोलीस निरीक्षक आणि इतरांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य केलं. गावकऱ्यांच्या मदतीनं बाजेच्या साह्यानं तीन भावाचे मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढण्यात आले.