युती सरकारच्या काळात माझ्या हाती चिमण्या मारण्याची बंदूक देण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हाती बॉम्ब दिला आहे, असं मत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. तत्कालिन युती सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार यामध्ये मोठा फरक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

मंत्रिमंडळात जी संधी आपल्याला देण्यात आली आहे त्याचं सोनं करू असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतही वक्तव्य केलं. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

जिल्हा परिषदेची तयारी पूर्ण
महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. निवडणुकीत आम्ही आमचं संख्याबळ सिद्ध करून दाखवू. निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल. खडसे हे सध्या आमच्या संपर्कात असून किती नेते संपर्कात आहेत हे आता सांगू शकत नाही. पण जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे, असंही पाटील म्हणाले.

कोण आहेत गुलाबराव पाटील ?
शाखाप्रमुख ते पक्षाचा नेता, असा गुलाबरावांचा प्रवास. पाळधी ग्रामपंचायतीपासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. जिल्हा परिषदेनंतर थेट विधानसभेपर्यंत मजल मारली. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचा प्रभाव असणाऱ्या जिल्ह्य़ात गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. २००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी त्यांचा पराभव केला, तरी सेनेत त्यांचे महत्त्व कायम राहिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देवकर जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. त्यामुळे पाटील यांना तिसऱ्यांदा विधानसभेत संधी मिळाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री पदावर बढती दिली. या शिवाय त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली.

भाजप नेत्यांशी नेहमीच संघर्ष
माजीमंत्री सुरेश जैन जळगाव घरकुल गैरव्यवहारात दोषी ठरल्यानंतर सेनेला जळगाव जिल्ह्य़ात भक्कम नेतृत्व उरले नव्हते. अशा वेळी गुलाबराव पाटील यांनी पक्षाला सावरले. जळगावच्या राजकारणावर अंकुश असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्याशी गुलाबरावांचे कधी जमलेच नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेना एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर गुलाबरावांनी खडसे आणि महाजनांना लक्ष्य केले होते. त्यामुळे खडसे समर्थकांनी गुलाबरावांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. पुढे भाजप-सेनेची युती होऊनही खडसे आणि गुलाबराव यांच्यातील वितुष्ट कायम राहिले. दरम्यान, खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर गुलाबरावांचा विरोध थोडा मावळला. सहकार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी भाजप विरोधात सूर आळवणे जवळपास बंदच केले. त्यामुळे महाजन यांची डोकेदुखी काहीकाळ थांबली. पण २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कोंडी करण्याच्या उद्देशाने भाजपने जळगाव ग्रामीणमध्ये बंडखोरांना प्रोत्साहन दिल्यानंतर शेवटी बिनसले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महाजनांशी त्यांचे खटकेही उडाले होते.