लोकसभेची जालना व औरंगाबादची जागा आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडेच राहणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले. जालना जिल्ह्य़ातील भोकरदन येथे जनजागरण यात्रेनिमित्त आयोजित सभा त्यासाठीच असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे या दोन्हींपैकी एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी सूचित केले.
काँग्रेसच्या वचनपूर्ती जनजागरण यात्रेचा जालना जिल्ह्य़ातील प्रारंभ शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते भोकरदन येथे झाला. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले,ह्व केंद्र व राज्य सरकारने गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली, हे जनतेला सांगण्यासाठी राज्यात काँग्रेसच्या वतीने जनजागरण यात्रा सुरू करण्यात आली आहे. जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास, तसेच दुष्काळासंदर्भातील अन्य योजना पूर्ण करण्यास राज्य सरकारने जालना जिल्ह्य़ास ९०० कोटींचे अर्थसाह्य़ केले. शिवसेना-भाजपची मंडळी केवळ शहरी भागाचा विचार करणारी आहेत. आघाडी व यूपीए सरकार मात्र ग्रामीण भाग व शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. देशातील जनतेसमोर उभे राहणारे जातीयतेचे आव्हान जनतेला समजून सांगण्यासाठी जनजागरण यात्रा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.