विधान परिषद उमेदवारीचे नाराजी नाटय़, इस्लामपूरमध्ये विरोधी आघाडी

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पक्षनिष्ठा आणि वाममार्गाने मिळविलेला पसा यावरून डागलेली तोफ आणि इस्लामपूर नगराध्यक्ष पदासाठी निशिकांत पाटलांचा विरोधी आघाडीशी झालेला घरोबा यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दिलीप पाटील यांची उमेदवारी ही सुरुवातीपासून गृहीत धरलेली होती. मात्र उमेदवारी देतेवेळी यामध्ये ऐन वेळी अन्य पक्षातून (रासप) आलेल्या शेखर गोरे यांना उमेदवारी दिली. गोरे यांची उमेदवारी अजित पवार यांच्या पाठिंब्याने ठरल्याचे बोलले जात आहे. यामुळे ही उमेदवारी जाहीर होताच पाटील यांनी त्यांची नाराजी व्यक्त करतानाच या निवडीवर टीका केली. यावेळी त्यांनी उमेदवारी ठरवताना आता पक्षनिष्ठेपेक्षा पशाला महत्त्व आल्याचे सांगत गोरे यांच्या निवडीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांची ही टीका जशी अजित पवार यांच्यावर होती तशीच ती जयंत पाटील यांच्याबाबतही असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र या टीकेवर आजतागायत पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने या निवडीतील राजकारणातही त्यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नगरपालिकेत आव्हान

दुसरीकडे पालिका निवडणुकीतूनही सध्या जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी वाढू लागली आहे. इस्लामपूर नगरपालिकेची सत्ता आजवर जयंत पाटील यांच्या ताब्यात राहिलेली आहे. विखुरलेल्या विरोधकांमुळे त्यांच्या या सत्तेला आजवर कोणी आव्हान देऊ शकले नव्हते. पण यंदा प्रथमच सर्व विरोधकांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. या विरोधी आघाडीमध्ये काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी असे सगळे पक्ष सहभागी झाले आहेत. ही आघाडी तयार होत असतानाच जयंत पाटलांचे खंदे कार्यकत्रे म्हणून ओळखले जाणारे निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेत विरोधी आघाडीशी घरोबा केला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. या आघाडीच्या माध्यमातून स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे विक्रम पाटील, काँग्रेसचे वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव जाधव, मनसेचे सनी खराडे आदी मंडळी आ. पाटील यांच्या परंपरागत गढीला सुरूंग लावण्यासाठी त्यांच्याच दारूगोळ्याच्या वापर करण्याच्या तयारीत आहेत. एकाच वेळी विधान परिषदेच्या उमेदवारीवरून घडलेले नाराजी नाटय़ आणि पालिका निवडणुकीत घरातच निर्माण झालेले आव्हान यामुळे जयंत पाटील यांची प्रथमच राजकीय कोंडी झाल्याचे दिसत आहे.