कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करू अशी घोषणा देखील कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामळे आता याचा महाराष्ट्रात विशेषकरून कोल्हापूर व सांगली भागावर काय परिणाम होणार, हे पाहावे लागणार आहे.अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवर आहे. या धरणामुळे कोल्हापूर व सांगलीत अनेकदा पूर परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्राकडून काहीसा विरोध दर्शवला जात होता. मात्र तरी देखील कर्नाटक सरकारने धरणाची उंची पाच मीटर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असल्याचे कळले. या निर्णयाचा अभ्यास करण्याची सुचना मी जलसंपदा विभागाला दिली आहे. निष्कर्ष निघाल्यानंतर आवश्यकतेनुसार कर्नाटक सरकारशी चर्चा करू.” असं जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

तसेच, ”पाणी किती पुढे जातं याला जास्त महत्व आहे आणि पाणी पुढं जाण्याचा संदर्भात त्यांनी मागच्या वर्षी, या चालू वर्षी चांगलं सहकार्य केललं आहे. त्यामुळे त्यांच्याशी आपण चर्चा करू. एकदम टोकाची भूमिका घेणं योग्य आहे असं मला वाटत नाही.” असंही जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

तर, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं, या अगोदरच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी सांगितलेलं होतं.