राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज अखेर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन बांधले. अेनक दिवसांपासून क्षीरसागर शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. आज गुरुवारी अखेर त्यांनी घड्याळ सोडून हातावर शिवबंधन बांधले. पक्षांतर्गत गटबाजीमुळे क्षीरसागर नाराज होते. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच क्षीरसागर हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. अखेर बुधवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोण आहेत क्षीरसागर ? बीड जिल्ह्यात ४० वर्षांपूर्वी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी प्रस्थापितांचे वर्चस्व कमी करून आपले नेतृत्व प्रस्थापित केले. शिक्षण व सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावात हक्काचा माणूस तयार करून प्रभाव निर्माण केला. विधानसभेच्या सहाही मतदारसंघात क्षीरसागरांनी निर्णायक राजकीय ताकद निर्माण केली होती. २० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दिवंगत केशरबाई क्षीरसागर व आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षात यावे यासाठी शरद पवार यांना स्वत: क्षीरसागरांच्या घरी धाव घ्यावी लागली होती.