रमजान ईदनंतर गोव्याकडे निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाचा घाला पडला. करमाळा (जि. सोलापूर) टेंभुर्णी महामार्गावर असलेल्या कुंभेज फाट्याजवळ भरधाव बोलेरो जीप (एमएच १९ ९८५६) कॅनॉलच्या कठड्याला धडकून थेट कॅनॉलमध्ये जाऊन पडली. यात मामा-भाच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला.

अधिक माहिती अशी, इस्लामपुरा (ता.जामनेर, जि. जळगाव) येथील शेख कुटुंबीय रमजान ईदनंतर दोन जीप करून गोव्याकडे निघाले होते. एक वाहन पुढे गेले होत. मागून येणारी दुसरी जीप कुंभेज फाट्याजवळ आली असता खराब रस्ता व अंधारामुळे जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप कॅनॉलच्या कठड्याला धडकून थेट कॅनॉलमध्ये जाऊन पडली. यात जीपमधील फारुक रमजान शेख (वय ६२), तयरिम जफर शेख (वय २०), फरहान एहसान खान (चालक, वय २३, सर्वजण रा. इस्लामपूरा, ता. जामनेर, जि. जळगाव) असे अपघातात जागीच ठार झाले. यात फारूक शेख आणि तयरिम शेख हे मामा-भाचे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.