राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रीय वारकरी परिषदेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. वारकरी संप्रयादातील संत अशा (पत्रक काढणाऱ्या) लोकांचेच प्रबोधन करत होते, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे. ट्विटवरुन आव्हाड यांनी या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय आरोप केले आहेत वारकरी परिषदेनं? वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी हे पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला आहे. 'पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये,' अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं आहे. आव्हाड काय म्हणाले? वारकरी परिषदेनं पत्रक जारी केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आव्हाड यांनी या बातमीची लिंक ट्विट करत यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. "वारकरी प्रथा परंपरा सुरु झाली ती इथल्या कर्मकांडाविरुद्ध पांडुरंग भक्तीमध्ये तल्लीन झालेले संत यांचेच प्रभोधन करत होते आणि कट्टर मनुवादी त्याला विरोध (करतात.) हे वारकरी परिषदवाले कोण आहेत याची ओळख द्यायला नको," असे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. वक्ते महाराज आहेत तरी कोण? वक्ते महाराजांना २०१८ सालचा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा 'ग्यानबा तुकाराम पुरस्कार' मिळालेला आहे. त्यांची हिंदुत्वावादी संघटनांशी जवळीक असल्याची चर्चा नेहमीच होत असते. हिंदुत्ववाद्यांबरोबर काम करणारे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात असणाऱ्या वारकऱ्यांवर वारकरी परिषदेचा प्रभाव आहे. खास करुन मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भामध्ये वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच वक्ते महाराजांनी जारी केलेल्या या पत्रकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.