बहुचर्चित कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा तपास आता सीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी लातूर पोलिसांना हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात आल्याचे सांगितले. कल्पना गिरी या लातूरमधील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या. रंगपचमीच्या दिवशी त्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर तुळजापूर येथील पाचुंदा तलावात कल्पना गिरींचा मृतदेह सापडला होता. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेत या प्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये कल्पना गिरी हत्याप्रकरण खूप गाजले होते. याप्रकरणी आतापर्यंत महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक करण्यात आली असून या दोघांनी हत्या केल्याची कबुलीसुद्धा दिली आहे. दरम्यान याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी राज्यसरकारला केली आहे.