कणकवली नगर पंचायत पंचवार्षिक निवडणूक येत्या ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल १ एप्रिलला होईल. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा फडकाविण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना राष्ट्रवादीतून काँग्रेस प्रवेश दिल्याने या निवडणुकीचा सत्तासंघर्षांचा निकाल कणकवलीकर कसा काय देतात याकडे लक्ष वेधले आहे. कणकवली नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ३१ मार्च रोजी मतदान तर १ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. कणकवली नगर पंचायतची मुदत २० एप्रिल रोजी संपत आहे. १ ते ७ मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, ८ मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी, १८ मार्चला अर्ज मागे घेणे, १९ मार्चला चिन्हांचे वाटप असा कार्यक्रम जाहीर केला आहे. कणकवली नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात शहर विकास आघाडी निर्माण होईल असे बोलले जात आहे. कणकवली नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर संदेश पारकर यांना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस प्रवेश दिल्याने या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व भाजप या नगर पंचायत निवडणुकीत सत्तासंघर्षांसाठी सज्ज झाले आहेत. सर्वच पक्ष स्वबळावर लढले तर त्याचा फायदा साहजिकच एखाद्या पक्षाला होईल. या ठिकाणी सर्वच पक्ष मतविभागणी करू शकतात. हे टाळण्यासाठी काँग्रेसविरोधी शहर विकास आघाडीचा पर्याय ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी सत्तासंघर्षांवर बोलताना शहर विकास आघाडीवर एकमत झाले नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकते, पण पुन्हा तेच नको म्हणजेच काँग्रेस पक्षाविरोधात लढण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. कणकवली नगर पंचायत निवडणुकीत सत्तांतर गरजेचे आहे.